आमच्यावेळी ना ...

 गेल्या महिन्यात झालेल्या reunion मध्ये जवळपास ३० वर्षांनी शाळकरी सोबती भेटले.आणि मग आठवणींचे धबधबे वाहू लागले.  एक जण सांगत होता कि BE झाल्यावर ह्या मित्रांनी गोव्याला जायचे ठरवले होते आणि कुठल्यातरी तारखेला मिरज स्टेशन वर १० जण जमणार होते आणि चक्क १० जण १० ठिकाणहून येऊन भेटले आणि एकदम मस्त गोवा ट्रिप झाली ज्याची आठवण आजही ताजी  तवानी आहे. फोन फारसे कुणाकडे नव्हते पण तरी निरोप पोचले आणि ठरल्याप्रमाणे सर्व झाले.

आणि मग गाडी नेहमीप्रमाणे आपल्या वेळी कसं होते  आणि आत्ताच्या मुलांना कित्ती काही काही लौकर मिळाले ह्यावर घसरली. तेंव्हा  पत्रं पाठवली कि उत्तर यायला २-३ आठवडे लागत . आवडती गाणी ऐकायला दिवस दिवस रेडिओ ऐकत असू. सिनेमा मॉर्निंग , मॅटीनी, इव्हनिंग अशात होता. रेल्वे तिकिटासाठी तास तास रांगेत उभे राहत असू. TV  वर एकमेव दूरदर्शन चॅनेल . एक ना दोन असंख्य गोष्टी ज्यात काल आणि आज मध्ये भयंकर तफावत आहे.

अशी तफावत लक्षात येऊ लागली हि बहुदा वय वाढू लागल्याची खुण आहे ज्यामुळे मन मागे मागे जायला बघते आणि जुनेच कसे सोने होते असं  वाटू लागते. मलाही तसेच  वाटायला लागले आणि एका मैत्रिणीनी एक वेगळा दृष्टिकोन मांडला. म्हणाली तेंव्हा जर तुला फोन सहज हाती असता तर नको होता का किंवा पत्राचे  उत्तर लगेच  आलेले आवडले नसते का ! म्हंटलं खरंच कि तेंव्हा सगळ्या गोष्टींची किती वाट पाहावी लागायची जी तेंव्हा आवडायची नाही पण दुसरा काही पर्याय नसे .  पण आज सततच्या संपर्काने ओलावा हरवतो आहे का .. किंवा गृहीत धरणे वाढले आहे काअसंही  वाटून जातं . गाणी हवी तेंव्हा ऐकता येतात हे खरे  पण अचानक खूप दिवसांनी एखादे गाणे ऐकायला मिळाले कि जो आनंद मिळायचा तो आवडते गाणे लूप मध्ये ऐकण्यात मिळतो का ? कारनी  आरामात जायला मजा येते कि  मैत्रीणीं  बरोबर सायकल नी  रस्ता अडवून चालवण्यात जास्ती मजा यायची ! पण तेंव्हा तर सायकल नी जात असताना कार मध्ये बसलेल्या लोकांकडे पाहत असू कि कसे हे आरामात जात आहेत.

मग लक्षात आले कि आयुष्य हे ब्लॅक आणि व्हाईट  ह्याच दोन रंगांचे नाही .. बाकी पण  रंग आहेत .. त्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्या किंवा वाईट ह्या खान्यात न टाकता, त्या इतर कुठे वर्ग करता येतील का शिकायला हवे. कल आज और कल चे चक्र सुरूच राहणार.

आणि पु. लं च्या असा मी आसामी च्या शेवटाची आठवण आली. घड्याळाचे काय आणि माणसाचे काय, आतले तोल सांभाळणारे चक्र नीट राहिले कि फार पुढे जायची हि भीती नाही आणि फार मागं पडण्याचीही नाही !!

Popular posts from this blog

सकाळची शोभा

बागकाम एक आनंद

प्रातःस्मरण